शिवचरित्रमाला भाग २१ रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग!
स्वराज्याचा विस्तार वाई प्रतापगडापासून थेट पन्हाळा विशाळगडापर्यंत जाऊन पोहोचला। शत्रूच्या हातून घडणाऱ्या चुकांचा आणि अभ्यासशून्य कृतींचा महाराज नेमका फायदा उठवीत असत. महाराजांची लष्करी प्रतिभा , म्हणजेच गनिमी काव्यातील काचकता विलक्षण चपळ होती. हे मराठी कोल्हे कोणचा डाव टाकतील अन् केव्हा टाकतील याचा अंदाजही शाही सेनापतींना येत नव्हता.


इथे एक गोष्ट लक्षात येते की , वेढा घालून दीर्घकाळ युद्ध करणे मराठी फौजेला परवडणारे नव्हते। कधीच परवडले नाही. संपूर्ण शिवकाळात भुईकोट ठाणी काबीज करण्यासाठी महाराजांनी फक्त दोनदाच वेढे घातले. हा पहिला मिरजेचा वेढा आणि दुसरा इ. १६७७ मध्ये तमिळनाडूमधील वेल्लोरचा वेढा. पहिला जमला नाही , दुसरा म्हणजे वेल्लोरचा जमला. पण तो भुईकोट जिंकायला १४ महिने लागले. असं नेहमीच परवडणारं नव्हतं. कमी माणूसबळ आणि कमी साहित्य यांमुळे सपाटीच्या प्रदेशातील भुईकोट जिंकणं फार खर्चाचं , वेळ खाणारं आणि समजा जिंकलंच तरी या भुईकोटांवर मोठीमोठी सैन्यं ठेवणं अवघड होतं. गरिबी! काय करणार ? म्हणून व्यवहार दक्षतेने महाराजांनी भौगोलिक विचार , नव्हे अभ्यास करून स्वराज्याचा विस्तार सह्यादीच्या आणि समुदाच्या आश्रयाने दक्षिणोत्तर केला. तोच यशस्वी ठरला. कोकणातील परकीय इंग्रजी , फिरंगी आणि हबशी शत्रूंना कायमचे उखडून काढावे याकरिता त्यांनी प्रयत्नांची शिकस्त केली. थोडेफार यशही मिळविले. पण भरपूर साधनांच्या आणि माणूसबळाच्या कमतरतेमुळे त्यांना यशही कमी मिळाले. पण प्रयत्न कधीही थांबविले नाहीत. आमच्याच माणसांनी जर महाराजांना मदत केली असती , तर मराठी सत्ता उत्तरेकडे केवळ तापीपर्यंततरच काय पण दिल्लीपर्यंत पोहोचली असती. महाराजांना सामील होऊन मदत करण्याकरता फक्त एकच बुंदेला राजपूत छत्रसाल उभा राहिला. बाकीसारे निरनिराळ्या बादशाहाचं इमानेइतबारे गुलामगिरीच करीत राहिले.
एक गोष्ट आत्ताच सांगण्यासारखी आहे। महाराष्ट्राची मुंबई पोर्तुगीजांच्या ताब्यात होती. पोर्तुगीज आणि इंग्लिश राजघराण्यातील एक लग्नसंबंधात पोर्तुगीजांनी इंग्लंडच्या राजाला आमची मुंबई हुंडा म्हणून द्यायचे ठरविले. करारही झाला. पण प्रत्यक्षात मुंबईत असलेले पोर्तुगीज अधिकारी मंुबईचा ताबा इंग्लिशांना देण्यास टाळाटाळ , चालढकल करू लागले. पोर्तुगीजांना खरं म्हणजे मुंबई सोडायची नव्हती. (पुढे इ. स. १९६१ मध्ये गोवा तरी कुठं सोडायची इच्छा होती!) त्यानंतर मिळेल तेवढा भारत गिळायची भूक लागली होती. आम्ही मंडळी उदार. कोणाकोणाला आमची भूक लागली आहे , हे टिपण्यासाठी आम्ही कायमचेच टपून बसलेलो होतो. अजूनही! पोर्तुगीज मुंबईचा ताबा सोडत नव्हते. यावेळी केवळ व्यापारासाठी ईस्ट इंडिया कंपनीच्या नावाने इंग्रजांची मंडळी सुरत , कलकत्ता , मदास इत्यादी ठिकाणी वखारी घालून बसली होती. सुरतेला जॉर्ज ऑक्सिंडेन नावाचा इंग्रज वखारीचा प्रमुख होता.
आता पाहा हं काय झालं ते! मुंबईतल्या आमच्याच अनेक पुढाऱ्यांनी सुरतेला इंग्रजी जॉर्जकडे पत्रे पाठविली। किंबहुना एकदा डेप्युटेशनच नेले की , हे इंग्रजांना , तुम्ही लौकर मुंबईचा ताबा घ्या. आम्ही तुम्हांस आमच्याकडून शक्य ती मदत करू.
पाहिलंत ? आमच्या मंडळींना सुरतेतले इंग्रज व्यापारी जवळचे वाटतात. मायबाप वाटतात. त्यांना पोर्तुगीजांचे जागी इंग्रजांचे राज्य असावे असे वाटते. पण शेजारीच कल्याण , भिवंडी , अलिबागपासून कुडाळ , ओरसपर्यंत स्वराज्य थाटून बसलेला , अफझलखानासारख्या कर्दनकाळाचा फन्ना उडविणारा , घाटावर पन्हाळ्यापर्यंतच्या मुलुखाचं स्वराज्य करणारा आपलाच शिवाजीराजा दिसत नाही. मुंबई घ्या , मुंबई आपली आहे , आम्ही तुम्हाला मदत करतो असं कुणी म्हणत नाही. आमची ही जन्मजात खोड आम्ही आम्हालाच परके समजतो.
No comments:
Post a Comment