स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले

                                                          

                         स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले

                      राजस्थानच्या चितौडगडच्या संग्रामात अल्लाउद्दीन खिलजीशी लढताना राणा लक्ष्मणसिंह नावाचा सेनानी आपल्या सात मुलांसह धारातीर्थी पडला. पुढे याच वंशातील भैरोसिंह उर्फ भोसाजी महान कार्य करून गेले. त्यांच्यामुळेच या वंशाला पुढेभोसलेहे नाव प्राप्त झाले. याच वंशात पुढे वेरुळस्थित बाबाजीराजे भोसले यांच्या घरात मालोजीराजे भोसले आणि उमाबाई भोसले यांच्या पोटी शहाजीराजे यांचा जन्म झाला.  मालोजी भोसले यांची पत्नी दीपाबाई (उमाबाई)हिच्या पोटी सिंदखेड इथे शहाजी यांचा जन्म १५ मार्च १५९४ रोजी झाला.(शहाजींच्या जन्मतारखेबद्दल इतिहासकारांत मतभेद आहेत.) (काहींच्या मते मालोजी भोसले यांची मुख्य राणी उमव्वा साठे यांची कन्या उमा ही असून तिच्या पोटी शहाजी व शरीफजी यांचा जन्म झाला. तर काहींच्या मते फलटणच्या वणगोजी निंबाळकर यांची कन्या दीपा ह्या शहाजी व शरीफजी यांच्या माता होत.) त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या मातोश्री उमाबाईंनी अहमदनगरजवळील शहाशरीफ पीराला ( सध्या अहमदनगर जवळील मुकुंदनगर भागात तारकपूर बस स्टँडपाशी) नवस बोलल्यामुळे त्यांनी आपल्या दोन्ही मुलांची नावे शहाजी व शरीफजी अशी ठेवली. मालोजीराजे भोसले आपला भाऊ विठोजीराजे भोसले इ.स.१५७७ मध्ये

सहकुटुंब सिंदखेड येथे लखुजीराजे जाधव यांच्याकडे नोकरीस आले होते. मालोजीचा मुलगा शहाजी व लखुजी जाधवाची मुलगी जिजाऊ हे लहानपणी एकत्र खेळत असत. पण घरातील विरोधामुळे लखुजींनी संबंध नाकारले. मालोजीला कमी लेखले गेले. तद्नंतर शहाजींचे पिता मालोजीराजे यांनी लखुजीराजे जाधव यांची नोकरी सोडून मालोजी पुन्हा वेरूळला आले. तिथे त्यांना देवीचा दृष्टांत होऊन द्रव्याने भरलेला हंडा सापडला. त्यातून मालोजीनी हजारो घोडे घेतले व आपली फौज तयार करून ते सरदार बनले. इ.स. १५९९ साली अहमदनगरच्या निजामाची नोकरी मिळवली. निजामशाहीवर मोगलाचे संकट आल्याने मालोजी भोसले निजामशाहीत कर्तबगार सरदार बनले व लखुजी जाधवाने आपली मुलगी शहाजींना देऊन सोयरीक जमवली.  
              पुढे जिजाबाईंशी शहाजीराजे यांचा डिसेंबर इ.स. १६०५  मध्ये विवाह
झाला. या वेळी लखुजीराव व मालोजीराजे हे दोघेही निजामशाहीत होते. पुढे लगेचच इंदापूरच्या लढाईत  मालोजीराजांना वीर मरण आले. कालांतराने जसेजसे शहाजीराजे मोठे होत गेले, तसतशी पराक्रम, राजकारण, मुत्सद्देगिरी या बाबतीत त्यांची कीर्ती वाढत सर्वदूर पसरत गेली.  शहाजीराजे आणि जिजाबाई यांचा वावर पुणे, मावळ खोऱ्यातील कोंढाणा , शिवनेरी येथे सुरु झाला. स्वधर्म आणि मानवतेला मूठमाती देणाऱ्या मुस्लिम साम्राज्याला शहाजीराजांचा अंतकरणापासून विरोध होता. जिजाऊशी बोलताना राजे आपल्या मनातील हा राग बोलून दाखवत.शहाजी राजांना वाटे आपले राज्य असावे पण ते शक्य नव्हते.त्यांना सुलतानी सत्तेची चीड येई.पण इलाज नव्हता. अन्यायाविरुद्ध उठले असते तर साथीला कोणीही आले नसते आणि बंडखोर म्हणून सुलतानी सत्तेच्या समशेरीखाली त्यांच्या देहाच्या पाकळ्या उडाल्या असत्या. वास्तविक शहाजी राजे फार मानी होते. मराठपणाचा आणि राजपूतपणाचा त्यांना फार अभिमान. आपल्या मराठमोळ्या माणसांविषयी अफाट प्रेम. त्यांच्या कल्याणासाठी जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे करत.
             मुघल शहेनशाह सलीम उर्फ जहांगीरने  इ.स.१६२४ ला दीड लाखाचे सैन्यासह निजामशाही संपविण्यासाठी दक्षिणेस पाठविले,  त्यावेळी निजामशहाचा वजीर मलिक अंबरने निजामशाहीच्या रक्षणासाठी आदिलशाहाची मदत मागितली. पण आदिलशहा ८० हजाराचे सैन्य घेऊन मुघलांना मिळाला. मलिक अंबर व शहाजीराजांनी निजामशाहीची फौज उभी केली. त्यात मराठेच जास्त होते. मरणारही मराठेच होते. शहाजीराजांकडे २० हजाराचे सैन्य होते. त्यातील् १० हजार अहमदनगरच्या रक्षणासाठी ठेऊन, १० हजार त्यांनी स्वत:कडे ठेवले. एवढ्या मोठ्या सैन्याला प्रचंड पाणी लागेल म्हणून मुघल आणि आदिलशाही सैन्याने उत्तर-दक्षिण वहाणाऱ्या मेखरी नदीजवळ भातवडी(. भातवडी हे गावं अहमदनगर पासून १५ किमी अंतरावर आहें.) येथे छावणी उभी केली. एरवी दुष्काळी असलेल्या अहमदनगरला तेव्हा चांगला पाऊस झाला होता. शहाजीराजांनी छावणीच्या उत्तरेस धरणाला असे तडे पाडले, की रात्री झोपलेल्या मुघल आणि आदिलशाही छावणीला काही कळण्यापूर्वीच छावणीची वाताहात झाली. अनेक योद्धे शहाजीराजांचे बंदी झाले. घनघोर रणसंग्राम झाला. शहाजी राजांनी व मराठ्यांनी पराक्रमाची शर्थ केली. यावेळी शहाजी राजांचे सासरे लखुजी जाधव मुघलांकडून लढत होते. सासरे-जावई जीव खाऊन एकमेकाविरुद्ध लढत होते. सुलतानशाही टिकविण्यासाठी भोसल्यांनी आपला घराचा नैवेध शरीफजी राजांच्या रुपान अर्पण केला. याच लढाईत शहाजीराजांचे बंधू शरीफजी धारातीर्थी पडले. यात शहाजी राजांनी निजामशहाला विजय मिळवून दिला. यामुळे शहाजीराजांचे नाव भारतवर्षात दुमदुमले.
            शहाजी राजाच्या मुळेच हा विजय मिळाला हे पक्के वजीर मलिक अंबराला कळून चुकले. त्यामुळे शहाजी राजांचा दरारा चारही पातशाहीत वाढला आणि हे मलिक अंबराला सहन होईनासे झाले. मलिक शहाजी राजांचा मत्सर करू लागला. मलिक अंबरच्या या मत्सरी वागणुकीला कंटाळून आदिलशाहीत दाखल झाले. आदिलशाहने शहाजी राजांना “सरलष्कर” हा किताब दिला
                  एका वर्षात चारही पातशाहीत राजकीय ढवळाढवळ झाली. मुघल बादशहा जहांगीर, विजापूरचा बादशहा इब्राहीम आदिलशहा व निजामाशाहाचा वजीर मलिक अंबर हे तिघेही जण वारले. निजामशाहीचा वजीर मलिकचा मुलगा फत्तेखान बनला, विजापूरचा महमंद आदिलशाह बादशहा बनला आणि जहांगीरचा पुत्र शहाजहान मुघल बादशहा बनला.
                  यावेळी शहाजीराजे आदिलशाहीतून निजामशाहीत परत आले होते. त्यावेळी निजामशाहाने राजांचे सासरे व मेहुण्यासोबत केलेल्या घातपातामुळे शहाजी राजे हादरले. मग त्यांनी भयंकर धाडसी बेत आखला.बादशाह विरुद्ध बंड पुकारले. ते यावेळी परींडया नजीक होते.तेथून संगमनेरास व मग पुण्यास आले. पुण्याची जहागिरी मालोजीराजांच्या पासून त्यांच्याच ताब्यात होती. राजांचे वाडेही पुण्यात होते. हाच स्वतंत्र मुलुख बनला. तीनशे वर्षानंतर आज पहिल्यांदा स्वातंत्र्याचा दिवस उगवला होता. विजापूरकर आदिलशहाचा प्रदेश भराभर ताब्यात घेतला. राजांनी एक असामान्य धाडस केले होते. याच काळात त्यांनी जिजाऊना शिवनेरीवर सुरक्षित ठेवले होते. किल्ले शिवनेरीचे किल्लेदार विजयराव सिधोजी विश्वासराव. शरीफजी राजांच्या पत्नी दुर्गाबाई यांच्याच घराण्यातील होत्या. म्हणून हि जोखीम विश्वासरावानी पत्करली.
                शहाजीराजांनी पुण्यात बंड करून आदिलाशाहाचा मुलुख ताब्यात घेतल्याने बादशहा खवळला. आदिलशाह वजीर खवासखानाने रायाराव नावाच्या मराठी सरदाराच्या हाती भली मोठी फौज बंड मोडून काढण्यासाठी दिली. आदिलशाही फौजा पुण्यात घुसल्या. आगी लावत, कत्तली करत शाही सैनिक थैमान घालू लागले. शहाजीराजांचे वाडे पेटले. घरादारांच्या होळ्या पेटल्या. राखरांगोळी केली. रायारावाने पुण्याच्या भोवती असलेली तटबंदी पडून टाकली. पुण्याच्या कुंभारवेस, मावळवेस, केदारवेस या वेशी सुरुंग लावून अस्मानात उडविल्या. पुणे प्रांतावरून गाढवे जुंपलेला नांगर फिरविला. एक लोखंडी पहार जमिनीत रोवून त्यावर फुटकी कवटी आणि तुटकी वहाण अडकविली. याचा अर्थ असा कि बंडखोर शहाजी भोसल्यांचे पुणे बरबाद झाले. आता येथे दिवा लागणार नाही. हे स्मशान झाले ! बादशहा विरुद्ध हत्यार उचलण्याचा नतीजा असा होतो ! महमंद आदिलशाह आणि खवासखानाने शहाजी राजांच्या “स्वराज्याची” अशी धूळधाण केली.
               शहाजी राजांचा डाव फसल्यानंतर त्यांनी मोघल सरदार आजमखान याच्यामार्फत शहाजहानला अर्ज पाठविला आणि मोघलांची पंचहजारी मनसबदारी पत्करली. मोघलांचाच एक सरदार दर्याखान रोहिला शहाजहान विरुध्द बंड पुकारून मराठवाड्यात आला होता. त्याचा पाडाव करण्याची जबाबदारी शहाजी राजांच्या वर सोपविली. राजे जिजाबाईचा निरोप घेऊन शिवनेरीवरून गेले आणि पाठीमागे शिवनेरीवर
वार शुक्रवार १९ फेब्रुवारी १६३० रोजी “शिवाजी” च्या रूपाने पुत्ररत्न झाले. पुत्र दर्शनासाठी उत्सुक असलेले शहाजी राजे दर्याखानाचा पराभव करून शिवनेरीवर आले. शिवरायांना पाहून त्यांनी अपार दानधर्म केला.वास्तविक शहाजीराजांना जिजाबाईपासून एकूण आठ अपत्य पैकी पहिले सहा जन्मताच वारली. उर्वरित दोन म्हणजे थोरले संभाजीराजे व छ.शिवाजीराजे. शहाजी राजांच्या द्वितीय पत्नी तुकाबाई ह्या स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या आत्याबाई होत. त्यांना एकच मुलगा व्यंकोजीराजे होय. ते नंतर तंजावरचे राजे झाले. काही इतिहासकारांच्या मते तिसरी पत्नी नरासाबा (नाटकशाळा) यांच्यापासून संताजीराजे हा मुलगा झाला. तर कोयाजी, हिरोजी, प्रतापजी, भिवजी व आनंदराव हे दासीपुत्र होते.
              शहाजहान बादशहा फौजेसह बुऱ्हाणपुरात दाखल झाल्याने शहाजी राजांनी शिवबा, जिजाऊ आणि गडाचा निरोप घेतला. निजामशाही बुडविण्याचा चंग शहाजहानने बांधला. त्याने दौलताबाद जिंकण्यासाठी महाबतखानाकडे सर्व अधिकार सोपविले. त्याच्यासोबत त्याचा मुलगा खानजमान हा देखील होता. आतापर्यंत निजामशाहीच्या विरुध्द मोघलांना करणारा आदिलशहा उद्या हे मोघल आपल्याला बुडवितील या विचाराने मोघलाविरुद्ध निजामशाहीला मदत करू लागला. शहाजीराजांनीही मोघलशाही सोडली व पुन्हा निजामशाहीत प्रवेश केला.
               शहाजहानची लाडकी पत्नी मुमताजमहाल तिच्या चौदाव्या बाळंतपणात मरण पावली; त्यामुळे तो महाबतखान आणि खानजमान यांच्या हाती मोहिमेची सूत्रे देऊन दिल्लीला रवाना झाला. महाबतखानाने दौलताबादला वेढा दिला.शहाजीराजांनी व आदिलशहाच्या सर्व सरदारांनी दौलताबाद लढविण्यासाठी शिकस्त केली. पण अखेर दौलताबाद पडला. खुद्द निजाम हुसेनशहा व वजीर फत्तेखान महाबतखानाच्या हाती लागले. महाबतखानाला वाटले; निजामशाही बुडाली! दरम्यान शहाजहानने निजामशाहीतील सगळ्या पुरुषाना ठार करवले. उद्देश असा की निजामशहीला वारस रहाणार नाही. तेव्हा शहाजीराजानी एक जबरदस्त महत्वाकांक्षी डाव मांडला. त्यांनी मुरार जगदेव या विजापूरच्या सरदाराला म्हटले की “एक निजामशाहीची दौलताबाद राजधानी गेली म्हणून काय झाले? आपण दुसरा वारस तख्तास उभा करून राजधानी बनवू. तुम्ही मला मदत करा. आपण मोघलांस हाकलून काढू.” शहाजीराजांच्या राजकीय कामगिरी व योग्यतेमुळे त्यांच्या या मसलतीस यश आले. आदिलशाहने निजामशाही पुन्हा उभी करण्यासाठी मदत करण्याचे कबूल केले. मुरार जगदेव शहाजीराजांच्या पाठीशी उभे राहिले. रणदुल्लाखान व इतर सरदार राजांच्या मदतीस आदिलशहाने रवाना केले.
                   निजामाच्या नात्यातील काही लोक जुन्नर तालुक्यातील जीवधनच्या किल्ल्यावर कैदेत होते. त्यापैकी छोट्या मुर्तझा म्हुणुन लहानशा वंशजाला शहाजीराजांनी झपाट्याने ताब्यात घेतले आणि गादीवर बसवून स्वत: कारभार हाती घेतला.  जणू स्वतःवरच छत्र धारण केले. बादशहाच्या सिंहासनावर मुर्तीजाला मांडीवर घेऊन बसणारी शहाजीराजांची मूर्ती म्हणजे एका स्वतंत्र मराठा राजाची मूर्ती होती. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील, संगमनेर तालुक्यातील पेमगिरी किल्ल्यावर घडली. त्यांचा हा स्वतंत्र राज्यकारभार जवळजवळ ३ वर्षे टिकला होता. त्यानी मुर्तझाच्या आईला त्याच्या सुरक्षिततेची हमी दिली.
                  दिल्लीचा बादशहा शहाजहानने ४८,००० सैन्य निजामशाही संपवण्यासाठी पाठवले. यापुढे शहाजीराजे व निजामशाहीचा टिकाव लागणे शक्य नव्हते, तरीही शहाजीने नेटाने लढा चालू ठेवला. शहाजीराजांनी निजामशाहीच्या रक्षणासाठी पराकाष्ठा केली. मोघलांनी जिंकलेला मुलुख काबीज करायला सुरवात केली. त्यांच्या या उद्योगाने शहाजहानने आपल्या सरदारांना शहजीराजांवर चढाईचा आदेश दिला. शहाजीराजांच्या ताब्यात असलेला परिंडा किल्ला घेण्यासाठी महाबतखानाचा पुत्र खानजमान चालून आला. शहाजहानचा पुत्र शाहजादा शुजाने दक्षिणेत आल्यावर महाबतखान खानसह परिंडयाला वेढा घातला. शहाजीराजांनी किल्ल्याच्या सभोवतालचा परिसर बेचिराख करून टाकल्याने वेढ्यातील मोघलांची उपासमार झाली. शिवाय राजांचे मराठी हल्ले चालूच होते. त्यामुळे त्यांची दैना उडाली. काही दिवसातच मोघलांची परिंडयापुढे हार झाली. या पराभवाने शहाजहान अत्यंत संतापला.
                  आता स्वतः शहाजहानच शहाजीराजांचा मोड करण्यासाठी निघाला. तो तडक दौलताबादेस आला. शहाजहानने आदिलशाहीला दमदाटीचे पत्र पाठवून आपल्याकडे वळवून घेतले. याच दरम्यान महमंद आदिलशहाने मुरार जगदेव यांचा वध केला. वजीर खवासखानाचा खून झाला. आदिलशाही फौजा राजांविरुद्ध मोघलांना मिळाल्या. राजांनी मुर्तीजा निजामशाहाला घेऊन माहुलीचा किल्ला गाठला. त्यावेळी त्यांच्यासोबत छोटे शिवबा व जिजाऊ पण होत्या. खानजमानने माहुलीला वेढा घातला. आता हा अखेरचा संग्राम. राजांनी आपले अप्रत्यक्ष स्वराज्य टिकविण्यासाठी शिकस्त केली. माहुलीच्या वेढ्यात रणदुल्लाखान होता. त्याला राजांबद्दल अत्यंत आदर वाटे. त्याने विजापुरास आपल्या आदिलशाही दरबारात बादशाहाशी बोलणे सुरु केले; राजांना विजापूर दरबाराने जहागिरी देऊन आपल्या दरबारी ठेऊन घ्यावे, अशी खटपट केली. याला आदिलशाहने मान्यता दिली. खानजमानने वेढा इतका कडक केला कि; राजांना दुःखी मनाने समशेर खाली ठेवावी लागली. माहुलीचे दरवाजे उघडले. निजामशहाच्या सुरक्षिततेसाठी आणि त्याच्या आईला दिलेल्या शब्दासाठी त्यांनी शहाजहानशी तह केला. या तहांतर्गत मुर्तझा शहाजहानकडे सुरक्षित राहील आणि शहाजी आदिलशाहीला मिळेल असे ठरले. शहाजीराजे शिवबा आणि जिजाऊसह गड जड पावलांनी उतरले. निजामशाही बुडाली. मोघल आणि आदिलशाहने निजामशाहीचा मुलुख वाटून घेतला.
             शहाजहानने सावधगिरी म्हणून आदिलाशाहाला सांगितले कि, शहाजीराजांना महाराष्ट्रात न ठेवता दूरच्या प्रांतात पाठवा. कारण महाराष्ट्र त्यांना बंड करायला फूस देतो. त्यामुळे आदिलशाहने राजांना “फर्जंद” दर्जा दिला. फर्जंद म्हणजे आदिलशहा नंतरचे दुसरे पद, युवराजाचा दर्जा. शहाजीराजांना बारा हजार स्वारांची सरदारकी देऊन दक्षिणेला कर्नाटकात बंगळूरची जहागिरी दिली. आदिलशाहीत असताना शहाजीराजांनी पुणे परगणा निजामशाहीकडून काबीज केला होता तोही त्यांच्याकडेच ठेवला. जिजाऊसाहेब आणि शिवबांना पुणे जहागिरीवर रवाना करून राजे रणदुल्लाखानाबरोबर कर्नाटकात गेले.  
               शहाजीराजांना बंगळूरचा प्रदेश फार आवडला. शहाजीराजे व त्यांचे थोरले चिरंजीव संभाजीराजे यांनी आपल्या मनातील स्वराज्य संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्याचे या ठिकाणी ठरविले. शहाजी मुळातच उत्तम प्रशासक व पराक्रमी योद्धे होते. त्यानी दक्षिणेतील राजांवर विजय मिळवून दक्षिणेला आदिलशहीचा विस्तार केला. पण हे करताना त्या हरलेल्या राजाना शिक्षा किंवा देहदंड न करता त्याना मांडलिक केले. त्यामुळे तेथील राजेलोकांना शहाजीराजांबद्दल आपुलकी व आदर वाटू लागला. ते राजे शहाजीराजांना मान देऊ लागले. त्यामुळे गरज पडली तेव्हा हे राजे शहाजींच्या मदतीला आले. रणदुल्लाखान तर राजांवर खूप खुश होता. त्याने बंगळूर शहर शहाजीराजांना प्रेमपूर्वक भेट म्हणून दिले. तेथे ते स्वतंत्र राज्यकारभार करून एखाद्या राजासारखे राहू लागले. त्यांच्या पदरी पोवाडे गाणारे शाहीर, नर्तक, गायक, कवी, पंडित, वस्तू, शस्त्रे, तोफा, हत्ती, घोडे, शूर लोक, मुत्सद्दी इत्यादीचा उत्तम संग्रह त्यांनी केला होता.  
               शहाजीराजांनी शिवबा व जिजाऊना बंगळूरला बोलावून घेतले. जिजाऊसाहेबांच्या संगे बरीच मसलत करून आपले पुत्र शिवाजीराजांना व जिजाऊना  पुण्यात आपल्या जहागिरीवर स्वतंत्र कारभार चालविण्यासाठी पाठवून दिले.  स्वराज्य स्थापनेसाठी बरीच अनुकूल परिस्थिती निर्माण करून दिली. शिवाजीराजांनबरोबर पेशवा,
आमात्य, मुजुमदार, डबीर, सबनीस इत्यादी हुद्दे देऊन काही हुशार, निष्ठावान मंडळी जसे की, शामराज नीलकंठ रांझेकर, बाळकृष्णपंत हणमंते, सोनो विश्वनाथ,  दादोजी कोंडदेव, बाजी पासलकर, रघुनाथ बल्लाळ अत्रे, कान्होजी जेधे नाईक व सातारचे शिंदे देशमुख  देऊन शिवरायांना मंत्रिमंडळच बनवून दिले. राज्यकारभारासाठीची आवश्यक राजमुद्रा, भगवा ध्वजही शहाजीराजांनीच शिवरायांना दिला.
              शिवाजीराजांच्या वाढत्या कारवायांना पायबंद घालण्यासाठी व स्वराज्य निर्मितीला शहाजीराजांची यांस फूस आहे या संशयाने तसेच शहाजीराजांच्या बऱ्याच तक्रारी आदिलशहा पर्यंत पोहचल्या होत्या. आदिलशाह व मुख्य वजीर नवाबने मुस्तफाखान, अफजलखान, बाजी घोरपडे, मंबाजी भोसले, बाजी पवार, बाळाजी हैबतराव, फतहखान, आझमखान यांना शहाजीराजांना गिरफ्तार करण्याचा आदेश दिला. मुस्तफाखानाने शहाजी राजांची भेट घेतली. तो राजांशी खूपच प्रेमाने वागू लागला. नेहमी आपला मत्सर करणारा गृहस्थ हल्लीच का आपल्यावर एवढे प्रेम दाखवितो आहे; हे राजांना समजेना. एकदा थट्टेने याबद्दल विचारणा केली तेव्हा मुस्ताफाखानाने मुलगा अतिषखान आणि कुराण शरीफची शपथ घेऊन म्हणाला, राजे, माझ्या हातून तुम्हाला हरगीज दगा होणार नाही. त्याच दिवशी मुस्तफाखानाने आपल्या सर्व सरदारास रात्रींचा छापा घालण्यासाठी तयार राहायला सांगितले.
                राजे शामियान्यात शांत झोपले होते. राजांच्या गुप्तहेराने राजांना त्या गुप्त मसलतीची योजना सांगितली. राजांना बातमी खोटी वाटली; कारण त्यांचा मुस्त्फाखानावर विश्वास होता; तो असे करणार नाही असे वाटून राजे पुन्हा झोपी गेले. उत्तर रात्री हजारो हशमांची धाड राजांच्या छावणीवर पडली. बाहेर चाललेला आरडओरडा ऐकून राजे ढाल तलवार घेऊन बाहेर आले आणि एका घोड्यावर स्वर झाले. बाहेर तुंबळ युध्द सुरु झाले होते. राजे घोड्यावरून लढत होते. शहाजीराजांना पाहून बाजी घोरपडे त्यांच्या अंगावर धावून आला. घोरपडे म्हणजे भोसल्यांचे भाऊबंद, एकच वंशाचे. एकाचा रक्ताचे. मुधोळकर भोसल्यांनी स्वतःला घोरपडे हे आडनाव स्वीकारले होते. राजे
व त्यांचे वीर शर्थीचे प्रयत्न करत होते. राजे थकत चालले होते. लढता लढता त्यांना भोवळ येऊन ते घोड्यावरून खाली पडले आणि बेशुद्ध पडलेल्या राजांना कैद करून हातापायात लोखंडाच्या बेड्या ठोकल्या. एके काळी शहनशहा शहाजहानला आणि आदिलशाहाला वर्षेन वर्षे शह देणारे साहसी शहाजीराजे आज या शेळपट शाही सरदारांचे सहज शिकार झाले होते.
               शहाजीराजांना कर्नाटकातील जिंजीजवळ कैद केले. अफजलखानाने साखळदंडांनी बांधून शहाजीराजांना मुद्दाम हत्तीवरून, भर विजापुरातून शहाजीराजांना दरबारात हजर करण्यात आले. तो दिवस होता २५ जुलै, इ.स. १६४८ चा. शहाजीराजांची रवानगी आदबखान्यात झाली. आता लवकरच राजांचा निकाल लावला जाईल अशी सर्वांची खात्री झाली. राजांच्या अटकेने सर्वच आदिलशाही सरदार खुश होते. पण हे कळताच शिवरायांनी आपल्या राजकारणाने त्यांच्या खुशीचा भोपळा लवकरच फोडला. शिवाजी महाराजांनी मुत्सद्दीपणाने राजकारण करत दिल्लीत मोगल सुलतान शहाजहानला एक पत्र पाठवले. स्वतः आपण व आपले पिता शहाजीराजे हे दिल्लीपतीची चाकरी करू इच्छितात असे त्यांनी लिहिले. या बदल्यात शहाजीराजांची विजापूरच्या कैदेतून मुक्तता करावी ही अट घातली. अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी शहाजीराजांच्या सुटकेसाठी दिल्लीच्या बादशहाला मधाचे बोट लावले होते. हा प्रयत्न यशस्वी ठरला. यामुळे आदिलशाही वरच मोठी आफत आली. आदिलशहा शिवाजीच्या राजकारणाने भांबावला. शेवटी त्याने शहाजीराजांची दि. १६ मे, इ.स. १६४९ रोजी सन्मानपूर्वक सुटका केली. या सुटकेच्या बदल्यात शहाजीराजांना बंगळूर शहर, कोंढाणा किल्ला आणि कंदर्पीचा किल्ला आदिलशहाला द्यावा लागला.
               अफझलखान स्वराज्यावर चालून आला तेव्हा, अफझलखानाची  दगाबाजी माहिती असल्याने शहाजीराजेंनी १७,००० फौज विजापूर बाहेर खडी ठेवली होती.
            शहाजीराजांच्या कारकिर्दीचा आढावा घेतला असता असे लक्षात येते की त्यांनी स्वाभिमान राखत आदिलशाही, मुघलशाही निजामशाही - या सर्व सत्ताधीशांकडे काम केले. त्यांच्या कारकिर्दीचे महत्त्वाचे टप्पे पुढीलप्रमाणे,
  • इ.स. १६२५ ते इ.स. १६२८ - आदिलशाही
  • इ.स. १६२८ ते इ.स. १६२९ - निजामशाही
  • इ.स. १६३० ते इ.स. १६३३ - मुघलशाही
  • इ.स. १६३३ ते इ.स. १६३६ - निजामशाही
  • इ.स. १६३६ ते इ.स. १६६४ - आदिलशाही
             पुढे इ.स. १६६१-इ.स. १६६२ दरम्यान बंगळूर मध्ये चांगला जम बसल्यानंतर ते काही काळासाठी महाराष्ट्रात आले होते. त्यांनी काही काळ जिजाऊ आणि शिवरायांसोबत घालवला. शिवरायांच्या स्वराज्याचा वाढता डोलारा पाहून ते धन्य झाले. स्वतः पाहिलेले स्वप्न शिवबा पूर्णत्वाकडे नेतील याची त्यांना खात्री झाली. त्यांनी त्यानंतरचा काही काळ शिवाजीराजे व जिजाबाईंसमवेत घालवला. आपण लावलेल्या स्वराज्याच्या रोपट्याचा आज विशाल वटवृक्ष झाल्याचे पाहून ते धन्य झाले. काही
काळानंतर ते पुन्हा आपल्या जहागिरीत परतले. माघ शुद्ध ५, म्हणजेच २३ जानेवारी,इ.स. १६६४ रोजी होदेगिरीच्या जंगलात शिकारीला गेले असताना त्यांच्या घोड्याचा एका वृक्षवेलीमध्ये पाय अडकला व ते खाली कोसळले आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ व्यंकोजीराजांनी राजपरंपरेप्रमाणे शहाजीराजांची उत्तरक्रिया केली व समाधी शिमोग्याजवळ होदेगिरी (जिल्हा दावणगिरी- कर्नाटक) येथे बांधली.
              शहाजीराजे आपल्या कारकिर्दित निझाम, मुघल आणि आदिल सत्तेत सरदार म्हणून राहिले. तरी त्यांची महत्त्वाकांक्षा स्वतंत्र राज्य स्थापनेची होती. ते स्वातंत्र्य प्रिय होते. त्यानी तसा दोनदा प्रयत्न केला, पण त्यास यश नाही आले. म्हणून त्यांना स्वराज्य संकल्पक म्हटले जाते. त्यांचे स्वप्न त्यांचे पुत्र शिवाजी महाराज  (महाराष्ट्र) एकोजीराजे  (तंजावर) यानी प्रत्यक्षात आणले.



     शहाजीराजांचा गुणगौरव करताना कवी म्हणतात,
  
        स्वराज्याची करी कल्पना, अविरत झुंजत राही |
       होदेगिरीच्या माळावरती, शहाजी चिरविश्रांती घेई ||



No comments: