शिवचरित्रमाला भाग ९५ रायगडाची व्यथा
मग अभ्यास कुठला ? त्याचे आचरण कुठले ? छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र हे केवळ कोणा एका असामान्य मानवाचे चरित्र नाही. ती एक राष्ट्रधर्माची , राष्ट्रीय चरित्र्याची आणि राष्ट्रनिष्ठेची गाथा आहे. ती आम्ही गुंडाळून ठेवली. आजही आम्ही काही वेगळे वागतो आहोत का ? मिरवणुकी , गुलाल , वर्गण्या , जयजयकार , अन् पुतळेच पुतळे , याशिवाय काही करतो आहोत का ? रायगडाच्या बाबतीत फक्त एकच गोड आनंददायी असा अपवाद इ.स. १७९८ च्या काळात नाना फडणवीसांनी केला. त्यांनी महाराजांच्या राजसभेतील सिंहासनाच्या चौथऱ्याची नित्य उत्तम व्यवस्था आस्थापूर्वक सुरू केली. नंदादीप , पूजा , कीर्तन , त्रिकाळ सनई चौघडा इत्यादी मंगल आचार उपचार सुरू केले. पेशवाईच्या अगदी शेवटच्या पर्वात ते ही बंद पडले. नगाऱ्यावर अखेरची टिपरी पडली. आमचे राष्ट्रीय चलनवलनच संपले. आम्ही ‘ कोमा ‘ त गेलो. जिवंत असूनही मेलो. रायगडावर इंग्रजांनी १ मे १८१८ या दिवशी हल्ला चढवला. कॅप्टन प्रॉथर हा नेतृत्व करीत होता. या वेळी गडाचा किल्लेदार होता अबुल फतेखान. आपलं सारं बळ एकवटून तो गडावरचा भगवा झेंडा सांभाळत होता. मराठे इंग्रजांना इरेसरीने टक्कर देत होते. पण अखेर दहाव्याच दिवशी म्हणजे १० मे १८१८ या दिवशी रायगडावर दारूगोळ्याचा प्रचंड स्फोट होऊन सारा गड धडाडून पेटला. वरून सूर्याची उन्हाळी आग , खालून इंग्रजांची तोफाबंदुकांची आग अन् गडावरही आगच आग. रायगड होरपळून गेला. शत्रू कॅ. प्रॉथर गडात शिरला. भयंकर अवस्था झाली होती रायगडाची. प्रॉथर गडात आला , तेव्हा एका खुरट्या लहानग्या झुडपाच्या लहानग्या सावलीत एक स्त्री बसली होती. ती होती शेवटच्या बाजीराव पेशव्यांची पत्नी. तिचं नाव श्रीमंत वाराणसी बाईसाहेब पेशवे. कॅ. प्रॉथर वाराणसीबाईसाहेबांशी अदबीने आणि आदराने वागला. त्याने त्यांना मेण्यातून सन्मानपूर्वक पुण्याकडे रवाना केले. ब्रह्माावर्त येथे स्थानबद्ध असलेल्या श्रीमंत दुसऱ्या बाजीराव पेशव्यांकडे नंतर वाराणसीबाईंची इंग्रजांनी रवानगी केली. रायगडावर उरली फक्त राख. सारे वाडे , राजसभा आणि होतं नव्हतं ते जळण्यासारखं सारं जळून गेलं. सर्वात धडाडून जळालं असेल रायगडचं रक्षण करण्याकरता दहा दिवस झुंजलेल्या अबुल फतेखानचं आणि मराठी सैनिकांचं काळीज. पुढच्या काळात रायगडाची सारी आबाळच होती. शिवाजीराजा छत्रपती या शब्दांची जादू एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मराठी मनांत पुन्हा शिलगावली गेली. नक्की वर्ष आणि दिवस माहीत नाही. कुठे सापडत नाही. पण थोर महात्मा आपल्या चार सहकारी सौंगड्यांनिशी रायगडावर आला. हाच महात्मा महाराष्ट्राला कळवळून सांगत होता , ‘ ज्ञान मिळवा. अभ्यास करा. ज्ञानाविण मति गेली , गती गेली , सर्वस्व गेलं. दारिद्यात आणि अपमानात कुजत जगू नका. मराठी पोरीबाळींनो , लेकीसुनांनो तुम्हीही शिका , फुकट राबणारे गुलाम होऊ नका. शेतकऱ्यांनो , कष्टासाठी अन् पोटासाठी कर्तबगारीचा आसूड हाती घ्या. ‘ या महात्म्याने शिवाजीराजांचं विश्वरूप ओळखलं होतं. हा महात्मा रायगडावर आला. त्याने शिवाजी महाराजांच्या समाधीवर डोकं टेकलं. महाराजांची कीतीर् आणि त्यांचे पोवाडे गाण्याचा जणू संकल्पच सोडून हा महात्मा रायगडावरून उतरला. महात्मा जोतीराव गोविंदराव फुले. ते नेमके केव्हा रायगडावर येऊन गेले , ती तारीख सापडत नाही. पुढच्या काळात लोकमान्य टिळक हे दोन वेळा रायगडावर येऊन गेले. त्यांनी महाराजांच्या समाधीच्या जीणोर्द्धाराचा संकल्पच सोडला. शिवाजी रायगड स्मारक मंडळ या नावाचा ट्रस्ट स्थापन केला. शिवजयंतीचे सार्वजनिक उत्सव देशभर सुरू झालेच होते. अशा सर्व लोकजागरणातून पुन्हा एकदा रायगडाकडे महाराष्ट्राचे लक्ष गेले
No comments:
Post a Comment