किल्ले भुदरगड - कोल्हापूर

              



                'छत्रपती' हे नावच मराठी मातीसाठी दैवीगुण देणार आहे. शिवाजी अन संभाजी हे नावचं कपाळाला लावलेल्या भंडाऱ्यासारखे. उधळला तरी येळकोट अन नाही उधळला तरी येळकोट. कोल्हापूरला अंबाबाईच्या आशीर्वादाबरोबर जोतिबाच्या उधळणाऱ्या गुलालाच्या रंगात रंगून चांगभलं आरोळी देणार , तालिमितील शडू ठोकणार असं हे रांगड कोल्हापूर. 

     अशा या कोल्हापुरवर स्वराज्याच्या दोन्ही धन्यांच प्रेमही तितकंच लाभलं. पन्हाळा-पावनगड असो, विशाळगड, रांगणा असो की पारगड, गगनगिरी असो की भुदरगड.

      असाच हा किल्ले भुदरगड. कोल्हापुरच्या दक्षिण दिशेला असणारा हा किल्ला. कोल्हापूरपासून साधारणपणे ५०-५५ कि.मी. अंतरावर हा किल्ला आहे.भुदरगड तालुक्यातील गारगोटी जवळील हा किल्ला आठशे मीटर लांब व सातशे मीटर रुंदी़चा हा किल्ला तेथील भैरवनाथाच्या जागृत देवस्थानामुळे


प्रसिद्ध आहे. किल्ल्याला दोन दरवाजे आहेत. दोन्ही प्रवेशद्वारे पूर्णतः ढासळलेली आहेत. तटाची मात्र खूप ठिकाणी पडझड झाली होती. पण आज रोजी गडाची तटबंदी पूर्णपणे जांभ्या दगडामध्ये पुन्हा बांधून झाली आहे. इथे दरवर्षी माघ कॄष्ण प्रतिपदेपासून दशमीपर्यंत मोठी यात्रा भरते.

        हा अजुनही चांगल्या स्थितीत असलेला गड, शिलाहार राजा भोज (दुसरा) यांने बांधला होता. त्यानंतर अदिलशाहीत बरीच वर्षे काढल्यानंतर १६६७ मध्ये स्वराज्यात आला. इ.स. १६६७ मधे छत्रपती शिवाजी महाराजांनी भुदरगडाची नीट दुरूस्ती केली व त्यावर शिबंदी ठेवून ते एक प्रबळ लष्करी ठाणे बनवले. परंतु मोगलशाहीमध्ये मोगलांनी हे ठाणे ताब्यात घेण्यास अल्पावधीतच यश मिळवले. पाच वर्षानी मराठ्यांनी भुदरगडावर अचानक ह्ल्ला करून तो जिंकून तर घेतलाच, पण मोगलांच्या प्रमुख सरदारास ठार मारले. मोगलांची निशाणे त्यांनी भैरवनाथास देऊन टाकली ती अजूनही देवळात आहेत.


अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात परशुरामभाऊ पटवर्धनांनी किल्ल्यातील शिबंदी वश करून त्यावर ताबा मिळवला. दहा वर्षे तो त्यांच्या ताब्यात राहिला.


इ.स. १८४४ मध्ये कोल्हापुरातील काहींनी बंड करून बरेचसे किल्ले ताब्यात मिळविले होते. त्यात सामानगड व भुदरगड प्रमुख होते. त्यांचा बिमोड करण्यास जनरल डीलामोटीने ससैन्य कूच केले. ऑक्टोबर १३ १८४४ रोजी इंग्रजांच्या सैन्याने भुदरगडावर पूर्ण ताबा प्रस्थापित केला.


असे बंडाचे प्रयत्‍न वारंवार होऊ नयेत म्हणून इंग्रजांनी तेथील तटबंदीची बरीच पाडापाड केली.

गडावर जाण्यासाठी गारगोटीवरून पाल बार्वे मार्गे किंवा गारगोटीवरून पुष्पनगर राणेवाडी मार्गे जाता येते. पेठ शिवापूर गावातून डांबरी सडक किल्ले भुदरगडावर जाते. पूर्वी पेठ शिवापूर हि बाजारपेठ होती. वाटेत महादेवाचे मंदीर व त्या समोर असलेला सुबक नंदी लागतो. या मार्गाने गडावर पोहचताच उजव्या हाताला भैरवनाथाचे वेगळया धाटणीचे हेमाडपंथी मंदीर दिसते. मंदीराभोवती ओवर्‍या, कमानी व दिपमाळा आहेत. मंदीरासमोरील तटबंदीत असलेल्या बुरुजावर ध्वजस्तंभ व तोफ आहे.



देवळामागील वाटेने पुढे गेल्यावर जांभ्या दगडात बांधलेला भव्य वाडा दिसतो. वाडयात गडसदरेचे अवशेष आहेत. वाडयाच्या पलिकडे करवीरकर छत्रपतींनी जिर्णोध्दार केलेले पुरातन


शिवमंदीर आहे. मंदिराच्या सभा मंडपात भालजी पेंढारकरांनी सॅन १९४५ ला छत्रपती शिवरायांचा अर्धपुतळा स्थापित केला आहे. मंदीर मुक्कामासाठी योग्य आहे.


वाडयाजवळील पायवाटेने पुढे गेल्यावर भुदरगडचे वैभव असलेला बांधीव दुधसागर तलाव लागतो. यातील पाणी मातीच्या गुणधर्मामुळे दुधट रंगाचे झाले आहे. तलावाशेजारी भग्नावस्थेतील अंबामाता मंदीर आहे.  मंदीरात आदिशक्ती भवानीची शस्त्रसज्ज देखणी मुर्ती आहे. तलाव उजव्या हाताला ठेवून काठाने पुढे गेल्यास अनेक समाध्या दिसतात. आणखी पुढे गेल्यावर गुहेत असलेले व गुहेच्या बाहेर सभा मंडप असलेले मंदीर लागते. मंदीरात भवानी मातेचे रूपे असलेली अनेक देवतांच्या मुर्ती दिसतात.


तेथुन झाडीतून मळलेल्या वाटेने उत्तरेकडे पुढे गेल्यास, आपण एका छोटया तलावाजवळ येतो. त्या ठिकाणी अनेक समाध्या आहेत. उघड्यावर असणारे नंदी व शिवलिंग दिसते. या ठिकाणी गडाची उत्तम स्थितीत असलेली उत्तर तटबंदी आहे. तटातील दगडी जिन्याने तटावर चढले असता, आपणास गड पायथ्याच्या पेठ शिवापूर गावचे सुंदर दर्शन होते.


 


पुन्हा माघारी दुधसागर तलावाजवळ यायचे तलाव जेथे संपतो, तेथे डाव्या हातास श्री महादेवाचे सुबक नक्षीकाम असलेले मंदीर दिसते. महादेव मंदिराच्या शेजारीच भवानी मातेचे पडझड झालेलं मंदिर दिसते. पूर्वेला  दुधी तलावात गणपती व शेजारी शिवलिंगव नंदी तलावाच्या पात्रात दिसतो.  त्याचबरोबर तलावाच्या शेजारून पुढे गेल्यास वेताळ बाबा मंदिर दिसते.

       पुर्वेकडच्या सरळ वाटेने पुढे गेल्यास नामशेष झालेले गडाचे प्रवेशद्वार आहे. दोन्ही बाजूनी दगड लावलेल्या वाटेने खाली उतरल्यावर एक भलीमोठी चौरस शिळा व या शिळेत कोरुन काढलेली १०० चौफूटांची खोली (पोखर धोंडी) दिसते. येथून पुन्हा माघारी आल्यावर प्रवेशद्वाराच्या बाजूला एक नंदी दिसतो. त्यासमोर जमिनीच्या पोटात खोदून काढलेले भुयार आहे. भुयाराच्या पायर्‍या उतरुन आत गेल्यावर अन्य मुर्त्यांसोबत जखुबाइची शेंदरी मुर्ती दिसते. आता आपण जागोजागी जिने असलेल्या पश्चिम तटबंदीवर चढायचे व भैरवनाथ मंदीरापर्यंत चालत जायचे. त्या ठिकाणी तटबंदीत आणखी एक बुजलेला दरवाजा दिसतो गडावर चिर्‍याच्या कोरडया पडलेल्या २ विहिरी व दोन तलाव आहेत .परंतु त्यातील पाणी पिण्यास अयोग्य आहे.


   गडावरील सर्वात सुस्थितीतील व प्रे़क्षणीय वास्तू म्हणजे श्री भैरवनाथाचे मंदिर. गडावर एक मोठा तलाव आहे. त्याच्याच काठी शंकराची दोन मंदिरे तसेच भैरवीचे मंदिर आहे.


       गडावर थोडीशी झाडी आहे. गडावरुन दुधगंगा-वेदगंगा नद्यांची खोरी, राधानगरीचे दाट अरण्य व आंबोली घाटाचा परिसर दृष्टीस पडतो. गडाच्या सर्व बाजूनी वनीकरण केल्यामुळे हा गडाखालील परिसर सदैव हिरवागार दिसतो.


       गडाखाली पेठ शिवापूर, गडबिद्री, जकींनपेठ, शिंदेवाडी, कदमवाडी, वरेकरवाडी, राणेवाडी, माडेकरवाडी, कालेकरवाडी, घावरेवाडी, चोपडेवाडी, पडखंबे, बारवे अशी छोटी गावे आणि वाड्या आहेत.

          


No comments: